पुणे : १२व्या ‘किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवा’चे उद्घाटन सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस. नल्लामुथ्थु यांच्या हस्ते चार जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. या समारंभात अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते ‘किर्लोस्कर वसुंधरा मित्र’ पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या महोत्सवाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र वनविभाग यांच्यासह अन्य संस्था व महाविद्यालयांचे सहकार्य लाभले आहे.
महोत्सवानिमित्त बालगंधर्व कलादालनात छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन पाच जानेवारी रोजी बंगळुरु येथील नामवंत छायाचित्रकार गणेश शंकर यांच्या हस्ते होईल. या वेळी त्यांचे ‘माय एन्काउंटर विथ कॅमेरा’ हे विशेष दृक् श्राव्य सादरीकरण होणार आहे.
इको बझारचे उद्घाटन पाच जानेवारी रोजी डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते व गौरी किर्लोस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत घोले रस्त्यावरील पंडीत जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन इथे होणार आहे.
‘ग्रीन कॉलेज, क्लीन कॉलेज’ स्पर्धेचा बक्षीस समारंभ सात जानेवारी रोजी पंडीत जवाहरलाल नेहरु सभागृह, घोले रस्ता इथे अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते आणि डॉ. विजय भटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
महोत्सवाच्या सांगता समारंभात विविध पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. ‘वसुंधरा सन्मान’ वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या एम. के. रणजित सिंह यांना दिला जाणार आहे. आरती कुलकर्णी यांना 'इको जर्नालिस्ट' पुरस्कार तर डॉ. दीपक आपटे यांना 'ग्रीन टीचर' पुरस्कार देण्यात येईल.